Thursday, June 25, 2009

अखेरचे चित्र...

ज्याच्या कुंचल्यातून प्रकटली चित्रे हो बहूविधनेक
ऐसा थोर आणि जगप्रसिद्ध असे तो चित्रकार एक
एके दिनी त्या चित्रकारा वाटे काढावे चित्र ऐसे एक
निरागसता आणिक निष्पाप मनाचे व्हावे ते प्रतीक

गावागावातून फिरून बघितल्या शाळा त्याने अनेक
त्यातूनी मग शेवटी निवडला मुलगा निरागस एक
काढीले मग चित्र त्याचे त्याने करुनी दिवसरात्र एक
पाहता पाहता चित्र ते गेले ओलांडून सीमा अनेक

मास सरले सरली कितीक वर्षे चित्रकार वृद्ध जाहला
क्रौर्याचे चित्र काढण्याचा ध्यास त्याने मनी घेतला
तुरूंगामागून तुरूंग पाहीले त्यातून कैदी एक निवडला
दाढी मिशा अन भयाण डोळे असा तो कैदी रेखाटीला

चित्राची त्या प्रत घेऊनी हाती मग कैदी ढसढसा रडला
फारा वर्षापूर्वी काढीले चित्र ज्या मुलाचे मीच तो बोलला

- अतुल (२ जून २००९)

AIR FRANCE Flight 447














रात्रीचे दहा वाजलेत...
ब्राझीलहून निघून झाले असतील तीनेक तास
बाहेर आजूबाजूला चिर्रर्रर्र अंधार..
रक्ताचा बर्फ होईल इतके थंड तापमान
समोर काळाकभिन्न अक्राळविक्राळ वादळी ढग़
आणि त्यात चाललेला राक्षसी वीजांचा नंगा नाच
आणि खाली.. पस्तीस हजार.. पस्तीस हज्जार फूटांवर
अथांऽऽग अथांऽऽग अटलांटीक
वादळाची महाकाय जीभ विमानाकडे करून पडलेला

पायलट कडून सूचना..
कमर पट्टे बांधा.. वादळात चाललो आहोत
माझ्या बाजूला एक माता तान्हूलीला घेऊन बसलेली
विमानाच्या हादर्‍यांनी तान्हूली गम्मत वाटून हसणारी
ती मातेच्या कुशीत आणि माता तंत्रज्ञानाच्या...
मानवी तंत्रज्ञान निसर्गावर मात करेल
असा फाजील आत्मविश्वास.. तिलाही, मलाही
अजून एक जोराचा धक्का, विमानात बरीच उलथापालथ
सगळे खडबडून जागे... काही अस्फूट किंकाळ्या
पायलटकडून, धीर देणारा एक फूटकळ संदेश

विमानाचे धक्के तीव्रतेने वाढताहेत
आणि लगेचच.. अजून एक जबरदस्त धक्का
पाठोपाठ कानठळ्या बसवणारा आवाज
क्षणात खूर्ची पूर्ण आडवी, तिला टांगल्या अवस्थेत मी
विमानातले दिवे गेले, सगळीकडे गुडूप अंधार
किंकाळ्या आणि आरडा ओरडा, चित्र विचित्र कर्कश्श आवाज
मम्माऽऽऽ.. एक कोवळी भेदरलेली हाक, दूरवर विरून गेली
आणि पाठोपाठ रक्त गोठवणारा, तिच्या मम्मीचा गगनभेदी हंबरडा
सार्‍या विमानात कर्कश्श आवाज, अंधार आणि प्रचंड कोलाहाल

श्वास घेणं अवघड होतंय...
जीव गुदमरून चाललाय, अचानक कडाक्याची थंडी
आणि अतिप्रचंड वेगाने खाली जात असल्याची जाणीव
बापरे! हे काय.. खिडकीतून बाहेर आगीच्या लवलवणार्‍या जिभा..
आणि लगेचच एक महाप्रचंड स्फोट.. एक महाप्रचंड स्फोट !
खुर्चीसह बाहेर फेकले गेलोय..
हातपाय बधीर सर्वाँग बधीर, श्वास पुर्ण कोंडलाय
जीवाची प्रचंड घुसमट, शरीराची प्राणांतिक तडफड

आता बस्स काही क्षणच...
मग सूटेन तडफडीतून कायमचा..
ह्या नव्हे.. कारण ही तडफड काहीच नाही, खरंच काही नाही
जेंव्हा तू सोडून गेली होतीस.. तेंव्हा ह्यापेक्षा जास्त तडफडलो होतो
आताची अवस्था त्यामानाने खूप बरी आहे.. खूपच बरी
आता बस्स काही क्षणच, आणि..
सुटेन कायमचा तुझ्या विरहातून
सुटेन... का... कायमचा... तु.. तु...झ्या विरहातून
सु... टे... न.... !!!

-अतुल (७ जून २००९)

Tuesday, May 5, 2009

पुनर्भेट...

शाळेच्या जीवनात असती ते तिघे मित्र खास
तिघे मिळूनी करीत असती मौज मजा अभ्यास
एकच सारे असे हो त्यांचे बस्स वेगळे नावास
एक पार्थ दूसरा नील अन तिसरा असे राजस

संपता शाळेची वर्षे उजाडला निरोपाचा तो दिस
भेटूया वीस वर्षानी पुन्हा इथे तिघानी ठरविले खास
काळ गेला दिन सरले सरले एका मागोमाग मास
उगवला दिन पुनर्भेटीचा वर्षानी एक दोन नव्हे वीस

मैदानावर संध्या समयी दिसला पार्थासी राजस
पण राजस मूकपणे निघूनी गेला करूनी गूढ हास्य
नंतर येता नील, पार्थ सांगे "गेला येऊनी राजस"
"राजस जग सोडूनी झाली वर्षे" बोले नील उदास

थिजले दोघे स्तंभित वारे स्तब्ध स्तब्ध उच्छवास
आकाशी चमकत होता परी कुणी तारा एक खास

-अतुल

Thursday, April 16, 2009

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी...

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी, कोणीतरी आपल्याला आवडतं. त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. कालांतराने हीच भावना बळावते आणि 'त्याच्या' किंवा 'तिच्या' शिवाय जगणे फार अवघड आहे इत्यादी इत्यादी विचार मनात येतात. हे सगळे फार नैसर्गिक आहे. खरंतर हा त्या वयाचा प्रताप असतो. खरंतर त्या वयात 'कुणीतरी' आवडावं इतकीच योजना निसर्गाने केलेली असते. पण 'त्याच्याशिवाय शक्य नाही' हा मात्र पूर्ण मनाचा खेळ असतो. आयुष्यात प्रथमच असे घडत असल्याने मनाची तशी समजूत होणे स्वाभाविक आहे. त्या वयात निसर्ग स्वप्न पहायची वृत्ती देतो, व्यवहार नव्हे. प्रेम करायची भावना देतो, विषयाकर्षण नव्हे. 'तूच एकमेव' चा विचार देतो, 'तू पण चालेल' नव्हे. थोडक्यात काय, तर मन स्वप्नाळू आणि अपरीपक्व असते.

पण हा काळ दुर्दैवाने जास्त नसतो. मनाची ही अवस्था आयूष्यभर राहू शकत नाही. ते जेंव्हा स्वप्नातून सत्यात येते, तेंव्हा 'स्वप्नात असताना' घेतलेले निर्णय जर त्याला चुकिचे वाटले तर मग सुरू होते ती मनाची असह्य फरफट. आणि प्रेम-विवाह करून नंतर घटस्फोट घेणार्‍या बहुतांश जोडप्यांमध्ये ही फरफटच कारणीभूत असते!

मग सत्य काय आहे? अशा मनाला काबूमध्ये आणावे तरी कसे? योग्य जोडीदार खरोखर 'एकमेव' असतो का? 'त्या वयात' मनाची समजूत कशी घालावी? असे अनेक विचार मनात येतात. आणि इथेच मन परीपक्व व्हायला चालू होते असे म्हणायला हरकत नाही.

व्यवहारी विचार केला, तर 'तो किंवा तीच एकमेव' ही कल्पना चुकीची आहे. एक नाही मिळाला तरी आपल्याला हवा तसा दुसरा जोडीदार मिळणे हे अवघड असले तरी अशक्य मुळीच नाही. शेवटी 'लग्नांतरचे यशस्वी आणि सुखी आयुष्य' हेच आपल्याला हवे असते ना? मग काय लागते त्यासाठी? तर त्यासाठी तीन 'स' पहावे लागतात. 'सवय, स्वभाव आणि समजूतदारपणा'.

सवयी काय आहेत? आपल्याला जूळणार्‍या आहेत का? (एकाला क्रिकेट आवडते तर दुसर्‍याला 'एकता कपूर' ची सिरियल! बस्स इतके कारण खूप असते. हो ना? :) स्वभाव कसा आहे. आपल्याशी जुळतो का? आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट 'समजूतदारपणा'. ही एकच गोष्ट पहील्या दोन्हींना पुरून ऊरेल. म्हणजे, जरी स्वभाव आणि सवयी जुळत नसतील तरी केवळ 'समजूतदारपणा'च्या जोरावर संसार खूप सुखी होतो.

तेंव्हा, तारुण्याच्या भरात पट्कन आवडून गेलेली एखादी व्यक्ती 'आयुष्याचा जोडीदार' करण्याची गडबड मुळीच करायला नको. ह्या तिन्ही गोष्टी पुरेसा वेळ देउन पहायला हव्यात.. आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की ह्या तिन्ही गोष्टि जुळणारी एखादी व्यक्ती जरी आपली झाली नाही, तरीही वाईट वाटण्याचे कारण नाही. आपल्यासाठी दुसरे कोणी तरी जरूर वाट पहात असते :)

Friday, April 10, 2009

ध्वनीवर्धक, फटाके आणि आपण...

परवाच्या सोमवारी एका महादेव मंदिरात गेलो होतो. मोठ्मोठ्याने कानठळ्या बसतील अशा आवाजात ध्वनिवर्धक लावले होते. ते मी बंद करायला लावले आणि मंदिरातील प्रसन्न शांततेचा अनुभव घेतला. देवाचे सानिध्य खरोखरीच अनुभवायचे असेल तर चित्त शांत हवे.

मुख्यत्वे गणेशोत्सवात, दिवाळीत आणि खाजगी समारंभांमध्ये ह्या आवाजाचा कहर होतो.

वातावरणात प्रचंड कोलाहल असेल तर चित्त शांत कसे राहील. मग अशा वातावरणात परमेश्वराची अनुभूती येईल काय? आणि जर परमेश्वराची अनुभूती येत नसेल किंवा आपण त्याची फिकिर करत नसू, तर गणेशोत्सवात गणरायाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यामागचे प्रयोजन तरी काय? असे केल्याने त्या मंगलमुर्तीची आपण कुचेष्टा करत आहोत असे वाटत नाही का?

मंगलमुर्तीच्या सान्निध्यात मंद तेवणारी समई असते, आणि सुवासाने वातावरण प्रसन्न होईल इतकाच धूर येणारी धूपबत्ती असते. तिथे आपण समईच्या जागी ढणाढणा पेटलेले कोलीत लावत नाही अथवा धूपबत्तीच्या जागी बकाबका धूर ओकणारे धुराडेही लावत नाही. मग आवाजाच्याच बाबतीत आपण असे का करतो? मनाला प्रसन्नता वाटेल असेच आणि इतकेच संगीत आपण का नाही लावत?

तीच गोष्ट दिवाळी आणि खाजगी समारंभांची. फटाकांच्या कर्णकर्कश्श आवाजाने इतरांच्या कानठळ्या बसवून 'आसूरी' आनंद घेण्याची आपली वृत्ती काय दर्शविते? नरकासूराचा वध केल्याबद्दल सारा परीसर दिवे आणि प्रकाशाने उजळून टाकण्याचा हा दिपोत्सव आहे. पण ह्याच काळात आपल्यातला एक 'आसूर' जागा होऊन दिवसा, रात्री/अपरात्री फटाके वाजवत इतरांना त्रास देत असतो. ह्या विरोधाभासाला काय म्हणावे? खाजगी समारंभांमध्येसुद्धा त्या मांडवापुरता तिथल्या लोकांनाच प्रसन्न वाटेल इतकाच ध्वनीवर्धकाचा आवाज न ठेवता सारे गल्लीबोळ आणि परीसर हादरून सोडल्याने काय साध्य होते?

ह्या कर्कश्श आवाजामूळे आजुबाजूच्या रहिवाशाना नागरीकाना त्रास होतो तो वेगळाच. त्याचा विचार कोणी करते का? कोणाला रक्तदाबाचा विकार असतो तर कोणाला डोकेदुखीचा, कोणाची कसली परीक्षा असते तर कोणाची नोकरीसाठी मुलाखत, कोणाला निद्रानाशाचा त्रास असतो तर कोणी कसल्या विवंचनेने त्रस्त असतात, कोणाच्या घरी लहान बाळे असतात तर कोणाच्या घरी अति वयस्क व्यक्ती. ह्या सर्वाना ध्वनीप्रदूषनाचा त्रासच होत असणार. ते लोक ध्वनिवर्धक लावणार्‍यांना, फटाके वाजविणार्‍यांना शिव्याशाप देत नसतील काय? मग सण समारंभ साजरे करणारे काय मिळवितात?

ध्वनीप्रदूषनाने काय होऊ शकते? ही clip जरूर पहा.

प्रत्येकाने विचार करावा

Monday, March 9, 2009

Little Match Girl



एक पोर ती थकलेली दमलेली अन झालेली पूरती क्षीण
"घेता का उदबत्ती काका" विनवी केविलवाणी ती दीन

खूप हिंडली खूप ती फिरली, कुणी ना तिची उदबत्ती खरीदली
घरी धाक सावत्र आईचा, धाकाने ना ती घरीही फिरकली

जोश ना उरला त्राण न उरले, वेळेचेही भान न ऊरले
झाली संध्या अंधार पडला, पक्षी ही घरट्याकडे फिरले

एकटी भूकेली गरीब ती बिचारी, अन्नासाठी वणवण फिरली
वाडे इमले अन माड्या त्या शहरी, परी कुणी न तिची दखल घेतली



रात्री अपरात्रीचा तो प्रसंग बाका, अन थंडीचाही वाढला कडाका
शोधिता आसरा भटकता भटकता, बंगल्यापाशी ती आली एका

टाचा उंचाऊन खिडकीतून दिसले, काचे पलीकडे मिष्टान्न सजले
करी आटापिटा जंग जंग पछाडले, हतबल वेडी हात पाय थकले

छातीशी मग हात बांधूनी, अन पोटाशी पाय घट्ट दुमडूनी
थंडीची ना मग तमा बाळगूनी, बसले कारुण्य आशा धरूनी



काळ पाऊली रात्र सरु लागली, थंडी कडाडून जोर धरू लागली
दूर कोठेतरी उल्का पडून गेली, भुकेल्या बाळीला ग्लानी आली

कष्टाने मग एक उदबत्ती पेटविता, अवचित एक चमत्कार झाला
घेऊनी खाऊ आणि खेळणी तिला, आज्जी आली भेटाया नातीला



आज्जी आज्जी तू कुठे ग होतीस, म्हणे तू तर ह्या जगातच नव्हतीस
लहाणपणी किती हट्ट पुरवायचीस, सोडून मला मग गेली कुठे होतीस

ओढूनी जवळ तिचे पापे घेतले, अन कुरवाळूनी तीज मग आज्जी बोले
का ग राणी तुझे डोळे असे ओले, चल मी तर तुला न्यायलाच आले



खूप खाल्ले अन खूप ती खेळली, आज्जी सवे मग दूर दूर निघाली
सकाळी जेंव्हा सुर्य किरणे आली, निष्प्राण तिच्या देहावर पडली

मातीत ते कोवळे हात पसरलेले, केले वरी उदर भूकेने व्याकूळलेले
संपले भूक-श्रम संपले आता सगळे, निस्चेष्ट पहूडले पार्थीव थकलेले

पांथस्थ थबकती हळहळून जाती, गहिवरती पाहूनी तो देह जीवहीन
परी कुणा न ठावे किती खुष ती, खेळता आज्जीसंगे तल्लीन

परी कुणा न ठावे किती खुष ती, खेळता आज्जीसंगे तल्लीन

(Hans Christian Andersen यांच्या The Little Match Girl ह्या कथेवरून)

Monday, March 2, 2009

सखे...


डोळ्यात पाहता पाहता अवचित मैत्र फुलावा
शब्दात गुंफता शब्द नात्याचा मेळ जुळावा
हलक्याशा विनोदा माझ्या खळखळून दाद तू द्यावी
अन शायरीत तुझ्या ग माझी संध्या न्हाऊनी जावी

मैत्री अशी दृढ व्हावी की शब्दास बंध नसावे
जे मनात तुझ्या ग आले माझ्याही मनी ते यावे
अथांग सागरी किनारा अन सुर्य पलीकडे बुडावा
एकही शब्द न बोलता तिथे संवाद आपला घडावा

चिंब पावसात भिजावे रखरखीत उन्हात फिरावे
साथीला तू असता बस्स निश्चिंत होऊनी जगावे
माळोरान तुजसवे तुडविता काट्यांची फुले व्हावी
चालता चालता तुजसवे ग धरणी अपूरी पडावी

हसावे तुझ्यासोबत अन कुशीत तुझ्याच रडावे
असता तुजसवे मज दु:ख़ ही सुखासम व्हावे
सुख़ दुख़े माझी सारी तुझ्याच आधीन असावी
अंकावरी निजता तुझ्या हलकेच पापणी मिटावी
अंकावरी निजता तुझ्या हलकेच पापणी मिटावी